बुधवार, ८ मे, २०१३


लिहू वाचू आनंदे…

आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात. काहींशी आपली मैत्री होते कारण त्यांचे आपले विचार सारखे असतात. ज्या व्यक्तीचे विचार आपल्या विचारांशी जुळत नाहीत अशा व्यक्ती कालांतराने सहजपणे दूर झालेल्या दिसून येतात. मित्रत्वाच्या नात्यात हळूहळू प्रेमाच्या रेशीम गाठी बांधल्या जातात. इथे मला प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम अपेक्षीत नाहीये हे विचारात घ्या. अशी मैत्री झाली की आपण नियमित एकमेकांना भेट असतो. मौजमजेसाठी सहलीला जातो. या मैत्रीच्या नात्यातून सुंदर जीवनाचा लाभ आपण घेत असतो. या दरम्यान आपल्यात अनेक विषयावर साधक बाधक चर्चा होत असतात. अशा चर्चा होणे मला वाटते फार गरजेचे आहे, कारण प्रत्येकाचे शिक्षण, वयानुरूप जीवनात आलेले अनुभव, विचार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. शंभर टक्के विचार कुणाचेच जुळत नाहीत. चर्चेमध्ये जी माहिती आपल्याला आपल्या मित्रांकडून मिळते त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. काही चांगल्या चालीरिती, काही रमणीय ठिकाणांची माहिती मिळते, आपल्या डोळ्यासमोर तिथे न जाताही चित्र उभे राहते नी आपल्या मनाला जो आनंद होतो समाधान लाभते. अशा चर्चेतून मिळणारे समाधान किंवा आनंद ज्याचा त्याने घ्यावयाचा असतो. कुठल्याही माध्यमातून विचारांची देवाण घेवाण व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यात चांगले मित्र मैत्रिणी, नातेवाईक मिळाले तर त आपले भाग्य म्हणावे लागेल. माझ्या आयुष्यात मला चांगल शिक्षक, मित्र मैत्रिणी, नातेवाईक मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. आज माझे जीवन आनंदी समाधानी नी संमृद्ध आहे या बाबतीत आपल्याला काय वाटते. आपण काय सांगाल. हरी ओम.

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, ०४०५२०१३.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा