गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२

जीवन आणि शिक्षण 

नमस्कार जी,

माणसाला रोजच्या जीवनात अनेक प्रसंगाला तोंड द्यावे लागते.  अगदी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत.  परंतु चांगल्या वाईट प्रसंगाला सामोरे जातांना, विचारपूर्वक सामोरे जाण्याची गरज आहे.  म्हणजे त्या प्रसंगातून जीवनात आनंद निर्माण करता येईल. अशावेळी विनोदबुद्धी ठेवावी. जेणे करून आपल्या मिस्कील स्वभावाचे दर्शन सर्वांना होईल.  बारीकसारीक प्रसंग असतात, काहीवेळा आपण त्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करतो, याचाच अर्थ आपण त्या आनंदाला पारखे होतो.  आपल्याला कार्यालयात जायची घाई असते. रस्त्यात डोंबा-याची लहान मुलगी अधांतरी तोल सांभाळत दोरीवरून चालत असते.  बघणारे बघत असतात. आपण एक क्षण न पाहता निघून जातो.  त्या मुलीपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. तिची एकाग्रता,जिद्द, पोटासाठी कोणतेही काम न लाजता करण्याची तयारी. प्रत्येक प्रसंगातून खूप काही शिकण्यासारखे आहे, मात्र आपण काहीही शिकत नाही हे खरे ना.  आठ दहा वर्षाचा मुलगा रस्त्याच्या बाजूला चणे शेंगदाणे विकत असतो, स्वत:चे पोट भरण्यासाठी, परिस्थिती अशी असते इच्छा असूनही गरिबीमुळे त्याला शिकता येत नाही.  या त्या मुलाच्या कृतीतून आपण कष्ट कसे करावेत हे शिकू शकतो.  अशा गोष्टी पाहण्यास आपणाकडे वेळ नसतो आणि इच्छाही नसते.  आपण परमेश्वरानी दिलेल्या सद्यस्थितीत आनंद मानतो आणि शिकण्यासारखे असूनही शिकत नाही.  आपल्या अंगीही अनेक गुण आहेत.  त्या गुणांपासूनही दुस-यास खूप काही शिकता येणारे आहे.  ते गुण किंवा ते गुण आपल्या अंगी कसे जोपासले हे दुस-यांना सांगण्याची आज गरज आहे असे मला वाटते.  यासाठी वेळ काढावयाची गरज आहे असे नाही,  ज्यावेळी आपण मित्रांशी गप्पागोष्टी करीत असतो  त्यावेळी बोलतांना हे विचार दुस-यांना प्रसंगाच्या अनुरोधातून सांगितल्यास आपल्या अनुभवातून त्यांनाही शिकता येईल.  लहान लहान प्रसंगातून शिकण्याची बुद्धी मात्र हवी...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, १३०९२०१२.


शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२

येईल का दाखविता


येईल का दाखविता तुला ग...
माझ्यावरील तुझे गाढ प्रेम...
नाही येणार दाखविता तुला...
मला अनुभवावं लागेल प्रेम...

येईल का रे सुगंध दाखविता...
त्या सुंदर टवटवीत फुलांचा...
नाही येणार दाखविता तुला...
वासाने कळवा गंध फुलांचा...

येईल का ग तृप्ती दाखविता...
मनाला होणा-या आनंदाची...
नाही येणार दाखविता तुला...
अनुभूती घ्यावी त्या तृप्तीची...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०७०९२०१२.

इंद्रधनुष्य
पावसाळ्यात अनेकदा इंद्रधनुष्य पहावयास मिळतं. एक नयन मनोहारी दृश्य. आपल्या डोळ्यात साठवून ठेवावं. इंद्रधनुष्याचे सप्त रंग आपल्या जीवनाशी निगडीत असतात. खर सांगायचं म्हणजे सुख, दु:ख, आनंद, समाधान, प्रेम, आपुलकी आणि कदाचित कोमलता इत्यादी भाव भावना त्यामध्ये असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपले जीवन हे विविध छटांनी भरलेले आहे. त्याचा आस्वाद घेतल्यास आपणास इंद्रधनुष्यातील रंगांची प्रचिती येईल. इंद्रधनुष्यांतील मनमोहक रंग आपणास जीवनातील अनेक गोष्टी सांगून जातात. पावसाला म्हटला की, सृष्टी हिरवीगार सुंदर, काहीशी हवीहवीशी, बोचरी असल्याचे आपणास जाणवते आणि मनात सुंदर विचार येतात. कविमनाच्या कवीला सुंदर रचनाही सुचतात याच पावसाळ्यात.  माझी बहिण वर्षा चौगुले तिच्या " खास " या कवितेत म्हणते, " आपल्या भेटीतले तुझे शब्द, ते सदैव.....माझ्याबरोबर, आणि हिरवगार मन माझं, ते मात्र तुझ्याबरोबर.." दुस-या एका " तू " या कवितेत आपल्या प्रियकराला म्हणते " तू ढग त्या रिमझिम पावसाचा, तू रंग त्या दुर्मिळ इंद्रधनुष्याचा." या विश्वातील प्रत्येक व्यक्ती ही मनाने कलाकार आहे. मात्र प्रत्येक कलाकाराच्या अंगी असलेली कला या वर्षा ऋतूत फुलून बहरून येते. सर्वांना आवडणारा हा पावसाला ऋतू जीवनाला एक वेगळी कलाटणी देवूनी जातो असे म्हटल्यास चुकीचे ठरणार असे माझे मत आहे. पटतंय ना आपल्याला.


प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०६०९२०१२.