जीवन आणि शिक्षण
नमस्कार जी,
माणसाला रोजच्या जीवनात अनेक प्रसंगाला तोंड द्यावे
लागते. अगदी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत. परंतु चांगल्या वाईट
प्रसंगाला सामोरे जातांना, विचारपूर्वक सामोरे जाण्याची गरज आहे. म्हणजे
त्या प्रसंगातून जीवनात आनंद निर्माण करता येईल. अशावेळी विनोदबुद्धी
ठेवावी. जेणे करून आपल्या मिस्कील स्वभावाचे दर्शन सर्वांना होईल.
बारीकसारीक प्रसंग असतात, काहीवेळा आपण त्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करतो,
याचाच अर्थ आपण त्या आनंदाला पारखे होतो. आपल्याला कार्यालयात जायची घाई
असते. रस्त्यात डोंबा-याची लहान मुलगी अधांतरी तोल सांभाळत दोरीवरून चालत
असते. बघणारे बघत असतात. आपण एक क्षण न पाहता निघून जातो. त्या मुलीपासून
खूप काही शिकण्यासारखे आहे. तिची एकाग्रता,जिद्द, पोटासाठी कोणतेही काम न
लाजता करण्याची तयारी. प्रत्येक प्रसंगातून खूप काही शिकण्यासारखे आहे,
मात्र आपण काहीही शिकत नाही हे खरे ना. आठ दहा वर्षाचा मुलगा रस्त्याच्या
बाजूला चणे शेंगदाणे विकत असतो, स्वत:चे पोट भरण्यासाठी, परिस्थिती अशी
असते इच्छा असूनही गरिबीमुळे त्याला शिकता येत नाही. या त्या मुलाच्या
कृतीतून आपण कष्ट कसे करावेत हे शिकू शकतो. अशा गोष्टी पाहण्यास आपणाकडे
वेळ नसतो आणि इच्छाही नसते. आपण परमेश्वरानी दिलेल्या सद्यस्थितीत आनंद
मानतो आणि शिकण्यासारखे असूनही शिकत नाही. आपल्या अंगीही अनेक गुण आहेत.
त्या गुणांपासूनही दुस-यास खूप काही शिकता येणारे आहे. ते गुण किंवा ते
गुण आपल्या अंगी कसे जोपासले हे दुस-यांना सांगण्याची आज गरज आहे असे मला
वाटते. यासाठी वेळ काढावयाची गरज आहे असे नाही, ज्यावेळी आपण मित्रांशी
गप्पागोष्टी करीत असतो त्यावेळी बोलतांना हे विचार दुस-यांना प्रसंगाच्या
अनुरोधातून सांगितल्यास आपल्या अनुभवातून त्यांनाही शिकता येईल. लहान लहान
प्रसंगातून शिकण्याची बुद्धी मात्र हवी...
प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, १३०९२०१२.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा